
मुंबई, दि. 30 : धडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेले अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हें पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.त्यामागचं कारण म्हणजे, मुंढे यांच्याविरोधात आता 29 कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनी तक्रार केली आहे. या कर्मचाऱ्यांनी थेट मंत्री नरहरी झिरवळ यांना पत्र लिहीलं असून त्यात तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत त्यांच्यावरोधात नाराजी व्यक्त केली आहे. या पत्राने मोठी खळबळ माजली आहे.
15 जुलै रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांनी अनेक गंभीर मुद्द्यांकडे लक्ष वेधलं . कामकाजाची नियमित वेळ असूनही अचानक दोन शिफ्टमध्ये काम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांना सकाळी 9 वाजल्यापासून रात्री उशीरापर्यंत काम करावं लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तसेच शनिवारची सुट्टी, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे असून, तसे या पत्रातही नमूद करण्यात आलं आहे.प्रयोगशाळेत अचानक दोन शिफ्टमध्ये कामकाज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयासाठी आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक सुविधा आणि संसाधने उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही. त्यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असून त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचेही कर्मचाऱ्यांचे म्हणणं आहे.