
मुंबई, दि. 6 : राज्यातील युवकांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभर 1 हजार रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे.
यासंदर्भात संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना आवश्यक नियोजन आणि अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत. या रोजगार मेळाव्यांद्वारे विविध उद्योग, कंपन्या आणि नियोक्त्यांना एकाच व्यासपीठावर आणून युवकांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने हे रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार असून, स्थानिक पातळीवरील बेरोजगार तरुण-तरुणींना त्याचा लाभ मिळणार आहे. तसेच कौशल्य विकास, उद्योजकता आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना देण्यावरही सरकारचा भर राहणार असल्याचे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले.या उपक्रमामुळे राज्यातील रोजगारनिर्मितीला गती मिळण्याबरोबरच उद्योग क्षेत्रालाही आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.












